३० जूनपासून सर्व शासकीय कार्यालये बंद करण्याचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची सरळसेवा पद्धतीने भरती न करता बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी भरती करण्यात येणार आहे,त्याच्याविरोधात राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने येत्या ३० जून पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे.याबाबतचे लेखी पत्रदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि संचालक यांना दिले आहे.

शासनाने अध्यादेशाद्वारे गट १ ते ३ पर्यंतची पदे सरळ सेवा भरतीने करायचा निर्णय घेतला आहे. फक्त गट ४ साठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. ही ३,६३२ पदे असून त्यात सध्याचे १९८१ वर्षांपासूनचे ९२२ बदली कामगार तसेच आरोग्य आस्थापनावरील राजीव गांधी जीवनदायी योजनेतील कामगारांना कायम करणे किंवा प्रलंबित असलेले वारसा हक्क व अनुकंपा तत्वावरील पदे यांचा कुठलाही समावेश नाही.याबाबत वर्षानुवर्षे पाठपुरावा करत असूनही काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या अन्यायाबाबत कर्मचा-यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. म्हणूनच ३० जूनपासून हे आंदोलन केले जाणार आहे. त्यानुसार ३० जून ते २ जुलै दरम्यान काळ्या फिती लावून काम तसेच जेवणाच्या सुट्टीत १ तास निदर्शने असे आंदोलन राज्यभर होईल. ३ ते ५ जुलै दररोज दोन तास काम बंद आंदोलन केले जाईल. त्यानंतर ७ जुलैला संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन असेल, अशी रुपरेखाही संघटनेच्या वतीने जाहीर केली गेली आहे. यानंतरही निर्णय घेतला गेला नाही तर मात्र बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या भरतीबाबत संघटना गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहे.वारंवार नोटीसादेखील देत आहे, असे असतानाही जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्यामुळे राज्य शासनाच्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्याचा उद्रेक या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येणार आहे.  भविष्यात फार मोठे आंदोलन यानिमि्त्ताने होईल व सर्व शासकीय सेवा ठप्प होतील, असेही पठाण यांनी म्हटले आहे.

Previous articleआ.पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे ;राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला गंभीर इशारा
Next article“त्या” ७ हजार उमेदवारांची निवड येत्या आठवड्यात