शिवसेना कुणासोबत युतीत सडले, हे दिसतय : फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भाजपवर निशाणा साधला होता.यावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती.मात्र आज आज चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेना कुणासोबत युतीत सडले,हे दिसत आहे असा टोला त्यांनी लगावला.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य केले.मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सरकार,त्यांनी केलेली विकासकामे आणि विकास यावर बोलतील अशी अपेक्षा होती.पण महाराष्ट्रातील बेशिस्त, भ्रष्ट्र आणि मंत्र्याची दरोडेखोरी,गफले घोटाळे यावर मुख्यमंत्री काय बोलणार ? त्यांच्याकडे बोलण्यासारखे नाही नसल्यामुळेच त्यांनी नेहमीचेच मुद्दे भाषणात मांडले अशी टीका फडणवीस यांनी करीत शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती.आज शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे त्यामुळे शिवसेना कुणासोबत युतीत सडले, हे दिसत आहे असा टोलाही त्यांनी हाणला.

दिवंगत बाळासाहेबांना आम्ही अभिमानाने अभिवादन करतो.पण ज्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.त्यांच्या नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त साधे एक ट्विट केले नाही आणि त्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्ता भोगत आहेत, यापेक्षा मोठी लाचारी कोणती ? असा सवाल फडणवीस यांनी केला.सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन बाबी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या असेही सांगतानाच,भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला.त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता असा सवालही त्यांनी केला.मुंबईत पहिला नगरसेवक हा भाजपचा होता शिवसेनेचा नव्हता असे सांगून शिवसेनेने विधानसभेची पहिली निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली असल्याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.यावेळी फडणवीस यांनी हिंदुत्वावरही यावेळी भाष्य केले.शिवसेनेचे हिंदुत्व हे कागदावरचे आहे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते.राम मंदिर, काशी विश्वनाथ, ३७० हे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले.त्यावेळी लाट होती असे म्हणता, १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले त्यापैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.त्यानंतरही तेथील जनतेने शिवसेनेला नाकारले. राम मंदिरच्या वादात कुणी सहभाग घेतला होता हे जनतेला माहित आहे. त्यामुळेच तेथील जनतेने शिवसेनेला नाकारले होते. आताही तेच होणार आहे असे त्यांनी सांगितले.

Previous articleमनसे आणि भाजपची युती होणार की नाही ? चंद्रकांत पाटलांनी केला मोठा खुलासा
Next articleगावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक न कळणा-या भाजप नेत्यांना उपचाराची गरज