“कहां गये वो २० लाख करोड” ? युवक काँग्रेसचे अनोखं आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून “कहां गये वो २० लाख करोड” ? हे राज्यव्यापी आंदोलन सुरु केले असून आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही मिळाले का? याची माहिती घेतली. यातून शेतक-यांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा पोकळ होती हे स्पष्ट झाले आहे.

या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतक-याला या २० लाख कोटींच्या पॅकेजचा लाभ झाला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रातील भाजप  सरकारकडून आम्ही अपेक्षाच करायचे सोडले आहे, भाजपने नेहमीच शेतकऱ्यांची निराशा केली आहे असा शेतकऱ्यांचा एकूण सूर  होता. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.

यापुढे दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे.मोदी सरकारने केलेली २० कोटींच्या पॅकेजची घोषणा किती पोकळ होती हे आता सिद्ध झाले आहे. एकाही घटकाला या पॅकेजचा लाभ मिळाला नाही. २० कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता हे आता सिद्ध झाले आहे. मग २० लाख कोटी रुपयांचे काय झाले? है पैसे कुठे गेले? हे जनतेसमोर आले पाहिजे असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले.

Previous articleमराठा आरक्षण : अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप
Next articleतुम्ही जिम सुरु करा, राज ठाकरेंचं जिम चालकांना आवाहन