मुख्यमंत्र्याच्या फार्महाऊसमध्ये घुसणा-या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक

मुंबई नगरी टीम

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रायगड येथील फार्महाऊसवर शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तिघे जण हे रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या तिघांनाही एटीएसने ताब्यात घेत त्यांना कोर्टात हजार करण्यात आले असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

खालापूर तालुक्यातील भिलवले येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फार्महाऊस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनीही आधी इम्तियाझ खत्रीच्या बंगल्याची चौकशी केली. त्यानंतर तिथल्या सुरक्षारक्षकाला मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठे आहे अशी विचारपूस करण्यात आली. या सुरक्षारक्षकाने आपल्याला माहित नसल्याचे उत्तर या तिघांना दिले. त्यानंतर हे तिघेही तिथून निघून गेले. सुरक्षारक्षका पाठोपाठ ते पत्रकार पाहोचले आणि बंगला माहित असूनही खोटे का सांगितले, असे म्हणत त्या तिघांनीही त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिथून पळ काढला.

संबंधित सुरक्षारक्षकाने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तर तिघांच्या गाडीचा नंबर पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आला.या माहितीनंतर नाकाबंदी लावून या तिघांनी पकडण्यात आले. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर हे तिघेही पत्रकार असल्याचे समोर आले. या घटनेनंतर फार्महाऊसवर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. तर दंगल नियंत्रण पथकाचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ माजली होती.

Previous articleसरकारची भूमिका अहंकाराची,कंगना प्रकरणावरून प्रवीण दरेकरांची टीका
Next articleकंगनाच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया … म्हणाले !