सरकारच्या नाकावर टिचून मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, केला लोकलने प्रवास

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल लवकरात लवकर सर्वांसाठी सुरू करावी या मागणीसाठी मनसेने आज रेल्वेने प्रवास करत आंदोलन केले.सविनय कायदेभंग करून सोमवारी रेल्वेने प्रवास करणार, असा आक्रमक इशारा मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी दिला होता. त्यानुसार संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या नियमांना डावलून सकाळी काही कार्यकत्यांसह रेल्वेने प्रवास केला.

रेल्वेने प्रवास केलेला एक व्हिडीओ देखील संदिप देशपांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “आम्ही अनेक वेळा सरकारला विनंती केली होती की सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू करा. कारण बस प्रवासाने लोकांचे हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही. परंतु रेल्वेत पसरतो असा सरकारचा समज झाला असावा.आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नाकावर टिचून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत”,असे संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांचे हे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान,मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ठाणे रेल्वे स्टेशनवर मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर आंदोलनापूर्वी अनेक मनसैनिकांनी पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, तरीही मनसेने आपले आंदोलन पूर्ण करत रेल्वे प्रवास केला. त्यामुळे आता सरकार यावर आपली भूमिका स्पष्ट करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला विचारला जाब
Next articleओबीसी समाजाने काळीज मोठे केले तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं