ही ‘श्रींची इच्छा! सोमवारपासून राज्यातील मंदिरे,प्रार्थनास्थळे उघडणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे आणि सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे येत्या सोमवारपासून म्हणजेच पाडव्यापासून उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील मंदिरे आणि सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद आहेत.गेल्या महिन्यापासून टाळेबंदीत शिथीलता देण्यात आल्याने राज्यातील बंद असलेली मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी होवू लागली. यासाठी भाजप आणि वंजित बहुजन आघाडीने राज्यात आंदोलनही केले होते.मात्र राज्यातील कोरोना वाढीचा धोका लक्षात घेता याला राज्य सरकारने परवानगी दिली नाही. मात्र आज दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.मुख्यमंत्र्यांनी येत्या सोमवारपासून म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरे आणि सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की,दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे.प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला.नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले.त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल.मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील! असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Previous articleदिवाळीत बेसावध राहिलो तर.. ! मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
Next articleराज ठाकरेंनी सफाई कामगारांची पूर्ण केली ‘ही’ इच्छा