ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा (बिल्डर) आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोमैया यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सादर केलीसोमैया म्हणाले की, आदित्य ठाकरे हे ३१ मार्च २०२० पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड पार्टनर होते असे दिसते आहे. मंत्री बनल्यावर जवळपास ४ महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात ? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे नाही का ? असा सवाल करीत याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख आहे.या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनीच याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे, असे सोमैया यांनी सांगितले.मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत ३० जमीन खरेदी करार झालेले दिसत आहेत. या सर्व व्यवहारांच्या ७/१२ उताऱ्यांवर ‘सदर जमीन लागवडीस अयोग्य” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.

रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रविंद्र वायकर म्हणजे उद्धव ठाकरे व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर या दोन्ही परिवारामध्ये कोणत्या स्वरूपाचे आर्थिक संबंध आहेत ? ठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का? त्यांची बिझिनेस पार्टनरशिप आहे का ? या दोघांनी अशाप्रकारे संयुक्त व्यवहार अन्यत्र केले आहेत का ? असा सवाल सोमैया यांनी केला.रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई येथील ३० जमीन खरेदीचे ७/१२ उतारे आम्हांला मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर ४० ७/१२ उतारे आहेत, त्यापैकी ३० ७/१२ उतारे हे रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत. हे ७/१२ उतारे पाहिल्यास लक्षात येते की, ही जमीन लागवडीस अयोग्य आहे. हे जमीन सीआर झोन मध्ये आहेत का ? मग या जागा विकत घेण्यामागे ठाकरे परिवार व वायकर परिवाराचा उद्देश काय होता ? ठाकरे परिवाराचे उद्धव ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार, प्रतिज्ञापत्रामधील माहिती बघितल्यास एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेस पडत आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे ? ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का ? पार्टनरशिप आहे का ? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्री ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय ? जमीन घेणे -विकणे, बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक होते, आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते शेअरहोल्डिंग आहेत.अनेक कंपन्यांमध्ये ते पार्टनर दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा मूळ व्यवसाय काय यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माहिती जाहीर करावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.

Previous articleएकनाथ खडसेंना कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईला रवाना
Next article‘नॉटी’ पुरुषांचे विचार महाराष्ट्रातून स्वच्छ करण्यास मदत करा,मिसेस फडणवीसांचा राऊतांना चिमटा