उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही; राणेंची टीका

मुंबई नगरी टीम

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेण्याचे केले आवाहन
  • फक्त महाराष्ट्रात कोरोना पसरतो..
  • सरकारला अधिवेशनाला जायचं नाही

सिंधुदूर्ग । राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नियमांचे योग्य पालन न केल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल.त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.एकीकडे सरकारकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात असतानाच विरोध मात्र यावरून ठाकरे सरकारवर टीका टिप्पणी करत आहेत. मनसेनंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही, असा घणाघात निलेश राणेंनी केला.तर अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना कसा वाढला? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊन हवा की नको ? असा प्रश्न जनतेला विचारला होता. यावर निलेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “जगामध्ये असा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत हा माणूस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस कोरोना जाऊ देणार नाही. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्याला घरीच बसायला आवडतं”, असे निलेश राणे म्हणाले.

आणखी एक ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. “१४००० ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? Lockdownच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबिल घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत Lockdown”, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बावनकुळेंचा प्रतिसाद

एकीकडे भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले आंदोलन पुढे ढकलले आहे. येत्या २४ फेब्रुवारीला भाजपकडून राज्यभरात वीज बिल वाढीसाठी आंदोलन केले जाणार होते. कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन स्थगित केल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, आजपासून काही दिवस राज्यातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

Previous articleराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शरद पवारांसह अनेक नेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय !
Next articleशिक्षणमंत्र्यांचे आदेश : फी वसुलीसाठी तगादा लावणा-या शाळांची होणार चौकशी