मुंबई नगरी टीम
- या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे
- संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला
- मोहन डेलकर प्रकरणी संबंधितांचे राजीनामे घेणार का ?
मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत,भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार भाजपवर केला आहे.एखाद्याचा राजीनामा घेणे आणि गुन्हा दाखल करुन मोकळे होणे म्हणजे न्याय देणे नव्हे असे सांगतानाच संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे.तपासातून जे समोर येईल त्यानुसार कारवाई होईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढत भाजपवर पलटवार केला.वनमंत्री संजय राठोड यांनी स्वत: हून राजीनामा दिल्याचे सांगतानाच राजीनामा स्वीकारला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.न्यायाने वागणे ही आमची जबाबदारी असून, दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे.मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे सांगून,एखाद्याला आयुष्यातून उठवायचेच, म्हणून काम केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असे म्हटले जात आहे. मात्र, तसे होणार नाही.ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याने कुणालाही पाठिशी घालणार नाही असेही ते म्हणाले.नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही असे सांगतानाच, तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना करुन दिली.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देत हा आरोप खोटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक करण्यात आल्याचे त्यांनी सांगून, सरकारचे सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करत आहात, असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी अनुभवला नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला. सावरकरांच्या पुण्यतितीवरूनही फडणवीस यांनी लाचारीची टीका केली होती.त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी फडणवीसांनी ठरवावे.सीमा प्रश्नावरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करताना, कर्नाटकात भाजपची सत्ता आहे,केंद्रातही भाजपची सत्ता आहे.खाली वर तुम्हीची सत्ता असताना सीमाप्रश्न का सोडवला नाही,असाही सवाल त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी संजय राठोड यांचा राजीनामा वाचून दाखविला.कोरोना संकटातही कर्जमाफीचे सात हजार कोटी दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपच्या काळात शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत होते ते आम्ही ते बंद केले. कोरोना संकटातही कर्जमाफीचे सात हजार कोटी दिले असल्याचे सांगून, खोटं बोलायचे ते रेटून बोलायचे हे त्यांना लागू पडते असे सांगतानाच, केंद्राकडून २९ हजार कोटी येणे बाकी आहे. का तिकडे जाऊन का नाही बोंबलत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाढत्या इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.वीजेबद्दल जो काही आक्रोश करताय तो पेट्रोल डिझेलबद्दल का नाही करत ? मोदी सरकार सत्तेवर आले त्यावेळेस भाव ७१ रुपये होता.आम्ही धोनी, विराट, तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली पण सरकारची सेंच्युरी आता पाहातोय अशी शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यात त्यांनी काही आरोप केले पण त्याला अर्थ असला पाहिजे. कशात काही नाही आणि आरोप करत सुटायचे ही आता पद्धत झाली आहे. मला त्यांची किव करावीशी वाटतेय असेही ठाकरे म्हणाले.केंद्रात सत्ता आल्यानंतर एक तर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आल्यानंतर खोट्याची इमले रचले आणि देश विकायला काढला हा देश विकायला काढणारे म्हणून तुमचा ही सरकारची नोंद होईल असे सांगून, महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचे कौतुक होते पण तुमच्या मनामध्ये काही थोडसं चुकलं असेल तर जरूर सांगा कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका अशी विनंती त्यांनी विरोधकांना केली.आज पूजाच्या आई वडिलांनी भेट घेतल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सात वेळा निवडून आलेल्या मोहन डेलकर या खासदाराने मुंबई आत्महत्या केली.त्यांच्या सुसाईड नोट मध्ये विशिष्ट नावे लिहिली गेलेली आहेत त्या तीन उच्चपदस्थ व्यक्तींचे आता राजीनामे घेतले गेला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.