लॉकडाऊन करायचा असल्यास लोकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करा;माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई नगरी टीम

कराड । राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.गेल्या वर्षी आढळून आलेल्या रुग्ण संख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी सापडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत.राज्यात लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देण्याबरोबरच राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खात्यात रोख रक्कम जमा करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारकडे केली आहे.

विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट मुंबई-पुण्यासह,मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ,उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे.परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सहा मागण्या
● लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे.
● लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे.
● या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे (पाश्चिमात्य देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करणे.
● खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देणे.
● शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.
● लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्च मध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Previous articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन
Next articleराज्यात संपूर्ण लॉकडाऊन की कडक निर्बंध, मॉल,मल्टिप्लेक्स,नाट्यगृह बंद राहणार ?