विद्यार्थ्यांना दिलासा : राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून पाहिले होते.मात्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांमधिल कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने येत्या १ मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन की,ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते.राज्य सरकारने यासंदर्भात आज निर्णय जाहीर केला असून, राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्याकोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली.राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कडक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली असून, या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत,याची दक्षता विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे पासून लस दिली जाणार असून यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.ज्याची अंमलबजावणी दिनांक १ मे पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असेही सामंत म्हणाले.शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असे सामंत यांनी सांगितले.

Previous articleजाणून घ्या : लॉकडाऊनमध्ये कोणाला एसटीने प्रवास करता येणार !
Next articleलॉकडाऊन : काय सुरू,काय बंद असेल ? या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर