ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने येत्या १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील व्यक्तींचा लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्यामुळे ४५ वर्षाच्या खालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये,राज्याला ४०० रुपये आणि खाजगी दवाखान्यांना ६०० रुपये दर राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमत ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही मलिक म्हणाले.गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच याबाबत घोषणा केली आहे असेही मलिक यांनी सांगितले.दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

केंद्राने रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल असेही मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.केंद्र सरकारच्यावतीने राज्यांना वाटप करण्यात येणारा रेमडेसिवीरचा डाटा जाहीर करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीने राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता देण्यात येणारा साठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.त्यावर केंद्राने आज २६ हजार दरदिवशी देणार होते त्यात ४० हजार अशी वाढ जाहीर केली आहे. यातून जो तुटवडा निर्माण झाला आहे तो काही प्रमाणात कमी होईल. मात्र दर दिवशी ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा अशी मागणी मलिक यांनी केली आहे.त्यामुळे ४० हजार देण्याचे जाहीर केले आहे.त्यामध्ये १० हजाराची वाढ केल्यास राज्याची अडचण दूर होणार आहे.रेमडेसिवीरचा दहा हजाराचा साठा लवकरात लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्वतः केंद्राकडे मागणी करत असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Previous article“या” कुटूंबांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार शिवाय २ हजाराचा किराणा माल मिळणार
Next articleआरोप थांबवा अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू !