लोकशाही संपली असे जाहीर करा;नाही तर चंद्रकांत पाटीलांनी न्यायालयाची माफी मागावी

मुंबई नगरी टीम

मुंबई । ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या राज्याचे अन्न वनागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही जामीनावर सुटलेला आहात असा धमकीवजा इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.न्यायालय सुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असे जाहीर करा.नाही तर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती.यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.आजपर्यंत भाजपकडून एजन्सीचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे अशी विचारणाही मलिक यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करा
Next article३७० कलम काढण्यासाठी जशी तत्पराता दाखवली तशी मराठा आरक्षणाबाबत दाखवा