रिक्षा चालकांनो..शनिवारी खात्यात १५०० रुपये जमा होणार,लायसन आणि आधारची नोंदणी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून म्हणजेच २२ मे पासून सुरु होत आहे.यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, लायसन क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाणार आहे.यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु होत आहे.

कोरोना संकटामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रिक्षा चालकांना १५०० रूपये अर्थसहाय्य करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना २२ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, लायसन क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षा चालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे. रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

Previous articleग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ
Next articleत्यांची भूमिका त्यांनी बघावी,मी काय भाजपाचा ठेका घेतलेला नाही : छ. संभाजीराजेंचा घरचा आहेर