ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई । ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या ११०० रुपये या कायम प्रवास भत्त्यात ४०० रूपयांनी वाढ करण्यात आली असून,आता ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांना आता १५०० रुपये इतका कायम प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भुमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात,विभागीय आयुक्त कार्यालयात ग्राम सेवक,ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.तसेच,ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती,पाणीपुरवठा साहित्य,आरोग्य संबंधीत साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालूका स्तरावर जावे लागते.बचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते. ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पुर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक,ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या ११०० रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करणे गरजेचे होते.त्यानुसार आता ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी अधिकारी यांना १५०० रुपये इतका कायम प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

Previous articleनितीन गडकरींना पंतप्रधान करावे ही भाजप नेत्यांचीच मागणी
Next articleरिक्षा चालकांनो..शनिवारी खात्यात १५०० रुपये जमा होणार,लायसन आणि आधारची नोंदणी करा