अण्णासाहेब पाटील महामंडळाने मराठा समाजातील तरुणांसाठी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी राज्यातील ३ हजार ७२७ लाभार्थ्यांना २ कोटी ९७ लाख एवढा व्याज परतावा वितरीत केला आहे. महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे.त्याचबरोबर पतकर्ज आणि पगार तारण कर्जांतर्गतचा व्याज परतावा पुन्हा सुरु करण्यात आला आहे.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांना राज्य सरकारतर्फे हमी देण्याचा निर्णय झाला होता.मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर हा निर्णय रद्द करण्यात आला होता.राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येताच ही हमी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे. असेही पाटील यांनी नमूद केले.

महामंडळाच्या कर्ज योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असे सांगून पाटील म्हणाले की,शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सारथी आणि महाज्योती महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक येथे मुलींचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Previous articleकालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतक-यांना मदत देण्याचे निर्देश
Next articleएकाच वेळी राज्यातील ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा