कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतक-यांना मदत देण्याचे निर्देश

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे.जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.विरोधी पक्षांने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बळीराजाला दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता होती.परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे.गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे.पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Previous articleपरतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Next articleअण्णासाहेब पाटील महामंडळाने मराठा समाजातील तरुणांसाठी घेतला मोठा निर्णय