मुंबई नगरी टीम
मुंबई । नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ञाकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. रोज ड्रग्ज घेतल्यावर नशाबाज जसे खोटेनाटे आरोप करतात तसेच रोज आरोप करण्याची नशा त्यांना लागली आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे आणि अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेले आरोप हे केवळ वैफल्यातून केल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, नवाब मलिक यांचा चेहरा व देहबोली पाहिली तर ते वैफल्याने पूर्णपणे ग्रासलेले दिसत आहेत. म्हणूनच ते भाजप व भाजपच्या नेत्यांवर अशी बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावरही आज टीकाटिप्पणी केली आहे. महिलांच्या संदर्भात व एखाद्याच्या कुटुंबियांवर टिका करताना त्यांची किळसवाणी प्रवृत्ती दिसून येते अशी टीका विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज केली
दरेकर यांनी सांगितले की, संविधानाच्या चौकटीमध्ये एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाशी द्वेष भावनेने वागणार नाही, असूया करणार नाही, जातीपातीच्या संदर्भात माझी भूमिका न्याय्य असेल, अशी शपथपूर्वक सांगतो, ही संविधानाची चौकट आहे. पण या सगळ्या चौकटींचे उल्लंघन नवाब मलिक यांच्याकडून होत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा केविलवाणा अट्टहास सुरू आहे. ते दलित आहेत की मुस्लिम आहेत हे सिद्ध करण्याचा प्रकार आता पर्यंत कधीच झाला नव्हता. हे त्या पदाला शोभा दणारे नाही. त्यामुळे मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.