नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा एल्गार सुरुच राहणार;दरेकरांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान आणि सलील यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांची देशद्रोही प्रवृत्ती राज्यातील जनता पाहत आहे.याच मलिकांना आता न्यायालयाने कोठडी दिली आहे,त्यामुळे विधानपरिषदेत भाजपा व मित्र पक्षांनी मलिक यांच्या कृत्याचा निषेध केला.तसेच मलिकांची पाठराखण करणा-या सरकारचा धिक्कार केला व गदारोळ केला.नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत देशद्रोह्यांना साथ देणा-यांच्या विरोधातील एल्गार सुरुच राहणार असा पवित्रा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत घेतला.

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या देशद्रोही बॉम्बस्फोटातील आरोपींशी संगनमत करून सामील असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची दरेकर यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर प्रसिध्दीमाध्यांशी बोलताना दरेकर म्हणाले, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभापतींकडे परवानगी मागितली परंतु, विरोधकांची मुस्कटदाबी करत नवाब मलिक व पर्यायाने दाऊदचे समर्थन राज्य सरकार करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टिकाही दरेकर यांनी केली.नवाब मलिक हे कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आहेत. मात्र, ते सध्या कोठडीमध्ये आहेत.तेव्हा,अधिवेशनात जर या विभागांबाबत प्रश्न उपस्थित झाले तर त्याचे उत्तर जेलमधून मिळवायचे का की त्यांच्या विभागाची प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावावी,असा टोलाही दरेकर यांनी लगावला.याआधी सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे समर्थन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहातून केले.परंतु,जनतेच्या आणि आमच्या मागणीसमोर सरकारला झुकावे लागले.यंदाही या सरकारला नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा लागेल. विधानसभा असो वा विधान परिषद आम्ही आक्रमकपणे मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.जनतेच्या दरबारात नवाब मलिक राजीनामा देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एल्गार देशद्रोह्यांविरुद्ध सुरुच राहणार असा इशाराही दरेकर यांनी दिला.

Previous articleभाजपाला इक्बाल मिर्चीचा पैसा चालतो का ? मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का ?
Next articleओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांची सरकारवर जहरी टीका