फडणवीसांच्या आरोपाची शरद पवारांनी काढली हवा ! टोकाची भूमिका का घेतली सांगितले कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.त्याचा समाचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.त्यामुळे अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत करून याबाबतचे ध्वनिचित्रमुद्रण त्यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुराव्यासाठी सादर केले.फडणवीस यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.फडणवीस यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.१२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणे ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र त्या रेकॉर्डिंगची सत्यता आधी तपासली गेली पाहिजे असे सांगून,त्यासंदर्भातील चौकशी राज्यसरकार नक्की करेल असे पवार म्हणाले. त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझेही नाव घेतले गेल्याचे दिसते आहे. मात्र माझे तरी यासंदर्भात कुणाशी बोलण्याचे काही कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधीत्व करत असते,त्यावेळेस त्याच्यावरच्या तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही.विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन त्यांना नाउमेद करण्याच्या प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये त्याची संख्या अधिक आहे असेही पवार म्हणाले.सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे असेही पवार यांनी सांगितले.

एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे,याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायचा काही संबंधच नाही असे सांगून, पवार यांनी विरोधकांच्या मागणीची हवा काढून टाकली. मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा हे फार निरर्थक आहे.एक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभे आहोत,असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे,त्यामुळे पंतप्रधान देखील याची खोलात जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

Previous articleफोन टॅपिंग व ब्लॅकमेलिंगसाठी रश्मी शुक्लांचा वापर कुणी केला ? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे
Next articleभाजपचे ‘१२’ निलंबित आमदार कोणत्या नियमानुसार सभागृहात बसतात ? पटोलेंनी केला सवाल