कोरोनाचे सर्व निर्बंध मागे,नववर्षापासून नवीन संकल्प करुयात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई । गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात,जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस,गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले.

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी,असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी,एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले.या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला.पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

Previous articleमोठी बातमी : राज्यात आता मास्क बंधनकारक नाही; कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले
Next article‘हे’ नुकसान झाले नसल्यास बैलगाडा शर्यतीमुळे दाखल झालेले खटले मागे घेणार