सेनेला मुख्यमंत्रिपद देऊन ‘मास्टरमाईंकडून’हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचे कारस्थान

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर । शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचे कारस्थान मास्टरमाईंडने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच रचून अंमलात आणले. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आले नाही,असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तरी हे कारस्थान उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात येईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकनचे नेते दिलीप जगताप यांनी यावेळी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा शरद पवार यांच्या जवळचे आहेत, असे आपण सतत सांगत होतो. आता संजय राऊत यांनी स्वतःच आपण शरद पवारांचा माणूस असल्याची कबुली दिली आहे. अशी जाहीर कबुली देण्यास धाडस लागते असेही पाटील म्हणाले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मास्टरमाईंडने एक योजना बनविली व त्यानुसार भाजपा शिवसेना यांच्या दरम्यान अंतर निर्माण करण्याची जबाबदारी एक एजन्सीला दिली गेली. दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्यासाठी रोज आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. परंतु, मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार पूर्णपणे संपविण्याचा मास्टरमाईंडचा कट त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात आला नाही. तो आता तरी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या ध्यानात यावा अशीही अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले की, शिवसेनेने सातत्याने जिंकलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला दिली. पण निवडणुकीत हाताला मतदान करताना कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी शिवसैनिक मतदार एकदा काँग्रेसकडे दिला की नंतर शिवसेना निवडणूक लढवित असताना काँग्रेसकडून परत आणता येणार नाही याची जाणीव मातोश्रीला झाली तर शेवटच्या दोन दिवसात निरोप येईल, असे वाटते.

Previous articleराज्यावरील भारनियमनाचे संकट टळले; महावितरणला वीज खरेदी करण्यास परवानगी
Next articleसिल्वरओकवर शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा