छगन भुजबळांची निवडणूक तयारी, म्हणाले…राष्ट्रवादीचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून द्या

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद । देशात काही लोकांकडून धर्मा धर्मात लढायला लावण्याचे कारस्थान केले जात आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ.आंबेडकर या समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांवर काम करत आहे.त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे.धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यास एकत्र येऊन काम करावे. यासाठी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून द्या असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ आज औरंगाबाद दौऱ्यावर असतांना त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.भाजपला दूर सारण्यासाठी पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करावे.लढायला शिका रडून काहीही उपयोग होणार नाही. जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवा.सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारी लोक अधिक लोकप्रिय होतात पवार यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांबाबत नियमित बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र काही लोक षडयंत्र करत आहे. ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडावे लागणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

ते म्हणाले की, संघटना अधिक मजबूत करण्यात यावी.यासाठी आपापसातील मतभेद दूर सारून एकत्र येऊन काम करण्यात यावे. हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे त्यातून आपल्या मागण्या अधिक लवकर पूर्ण करण्यास शक्य होणार आहे.औरंगाबाद महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून द्या असे त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद शहर व जिल्ह्यात ११६ नवीन रेशन दुकानांचा जाहीरनामा तयार करण्यात आला असून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दुकान देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमहाविकास आघाडीचे सरकार देशासह संपूर्ण जगातील सर्वात भ्रष्ट सरकार
Next articleकोल्हापुरात पराभव दिसताच भाजपाकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न : काँग्रेसचा आरोप