केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर राज ठाकरे संतापले ! ..काय म्हणाले

मुंबई नगरी टीम

मुंबई । अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली आहे.या वादग्रस्त पोस्ट नंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून,कळंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे.या पोस्टनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली समाज माध्यमातून त्यांनी केतकी चितळेने केलेल्या पोस्टचा निषेध केला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.या पोस्ट नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.ठिकठिकाणी केतकी चितळे हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यावर कळंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे.या विरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.त्यांनी समाज माध्यमाद्वारे एक पोस्ट केली आहे.कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली.खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे.विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो.एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो,त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबरमतभेद जरूर आहेत आणि रहातील,परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली.चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा! पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

Previous articleमहापालिका,जिल्हा परिषदा,ग्रामपंचायती,नगरपंचायतींच्या निवडणुका केव्हा होणार ? १७ मे रोजी फैसला
Next articleयापुढे हात उगारल्यास हात तोडून त्याच्याच हातात देईल ! सुप्रिया सुळे कडाडल्या