राज्यसभेसाठी भाजप तिसरा उमेदवार देणार का ? चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.त्यामुळे राजसभा निवडणुकीत भाजपमध्ये तिसऱ्या उमेदवाराबाबत साशंकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने दोन उमेदवार उभे केले तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल.राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयी बोलताना पाटील म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला आणि कारवाई झाली हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी.महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवत नाही याचा संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमातून हा सात्विक संताप व्यक्त केला त्यांना त्यामुळे आनंदच झाला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. आपण जे मत व्यक्त केले त्याबाबतीत पराचा कावळा करू नये, असेही पाटील म्हणाले.

Previous articleमुंबई आणि पुण्यात कोरोना वाढतोय, मास्क वापरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
Next articleशिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचे अर्ज दाखल; संभाजीराजे कोणता निर्णय घेणार ?