मोठी बातमी : महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविद्यालयातून तासिकातत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय घेतानाच विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत नॅक मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते.राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी,तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे,यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.राज्यातील तासिका तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो तासिकातत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांचे आकृतीबंध तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देताना आकृतिबंध पूर्ण झालेल्या मात्र नॅक मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यायालयातील ५० टक्के पद भरतीला मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दर्जात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता कामा नये अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.

Previous articleसुभाष देसाईंचा पत्ता कट ? ; विधानपरिषदेसाठी शिवसेना,भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चर्चा
Next articleशाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय