मुख्यमंत्र्यांचा दणका : शिवसेनेचे पाच बंडखोर मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांची खाती काढली

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत आले आहे.शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली असतानाच शिवसेनेने बंड केलेल्या मंत्र्यांकडे असणारी खाती काढून दणका दिल्याने बंड केलेले पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री आता बिनखात्याचे मंत्री असणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे,गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

बंडखोर आमदारांना परत येण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मुदत देण्यात आली होती.मात्र बंडखोर आमदार आपल्या मतावर ठाम आहेत.त्यातच बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणा-या आमदारांची संख्या वाढत असतानाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात गेल्याने सध्या शिवसेनेत सुभाष देसाई,अनिल परब,आदित्य ठाकरे आणि शंकर गडाख हे मंत्री राहिले आहेत.राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज या बंडखोर आमदारांना दणका दिला आहे.बंडखोर आमदारांच्या गटात सामिल झालेल्या मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज घेतला.एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे,गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकरगडाख यांच्याकडे तर उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी केलेल्या राज्यमंत्र्यांनाही दणका देत राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण हे खाते राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात दिले आहे. वित्त,नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन ही खाती विश्वजित कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण खाते विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आले आहे.वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग खाती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आली आहेत.अन्न व औषध प्रशासन हे खाते सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्य खाते आदिती तटकरे यांच्याकडे,अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील महसूल खाते प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आले आहे.ग्राम विकास खाते सतेज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.बंदरे,खार जमिनी विकास,विशेष सहाय्य खाते आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रहार संघटनेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण खाते आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार खाते सतेज पाटील यांच्याकडे,महिला व बाल विकास खाते संजय बाबुराव बनसोडे यांच्याकडे तर इतर मागास बहुजन कल्याण खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

बंडखोरी केलेल्या मंत्री आणि राज्यमंत्र्यांमुळे जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे,आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बंडखोरी केलेले पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल.त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleबंडखोरांना दुसरा धक्का ; अजून चार आमदारांना अपात्र करण्याची शिवसेनेची मागणी
Next articleसंजय राऊत शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत ते शिवसेना संपवायला निघालेत