राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेत असलेले श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे रायगडात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जात आहे.यावेळी मीरा भाईंदरमधिल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका दिप्ती भट्ट,अनिता पाटील व कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेत बारा वर्षे नगराध्यक्षपद भूषविले होते.त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.२०१९ मध्ये अवधूत तटकरे यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने ते नाराज होते.त्यामुळे अवधूत तटकरे काही काळ राजकारणापासून दूर राहिले होते.याच काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते.राज्यात शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्याने अवधूत तटकरे नाराज होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

अवधूत तटकरेंचा भाजपा प्रवेश म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा झटका आहे व निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.युतीमध्ये भाजपाने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजपा स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करत आहे.रायगड,पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत असेही बावनकुळे म्हणाले.

Previous articleबाळासाहेबांनी मला झोपडपट्टीतून पुढे आणत मुंबईचे महापौर केले
Next articleखूशखबर : दिवाळीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना बिनव्याजी १२ हजार ५०० रूपयांचा अ‍ॅडव्हान्स मिळणार