घेतले खोके…भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे…विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

मुंबई नगरी टीम

नागपूर । घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे…राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणा-या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट शासनाने घाईगडबडीत उच्च न्यायालयाला पाठवला.यात सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.यावरून विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजीही केली.अध्यक्ष सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आमचा समज झाला आहे असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सभात्याग केला.उच्च न्यायालयाने इतकी घाई का केली अशी विचारणा करत, शुक्ला यांनी माझा फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. नियमानुसार ५७ ची सूचना एक तास आधी देणे आवश्यक असताना नाना पटोले यांनी ती उशीरा दिली. त्यामुळे आपण सूचना नाकारल्याचे सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यावर नाना पटोले यांच्यासह सदस्यांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. सभागृह नियमानुसारच चालेल असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.नाना पटोले यांनी माझा फोन टॅप करून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप केला.त्यावर अध्यक्ष प्रश्नोत्तरे घेण्यावर ठाम होते. त्यामुळे विरोधी बाकावरील सदस्यांनी वेलमध्ये येत परत “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोन टॅप करून विधिमंडळ सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आल्याचे सांगितले. अलिकडे अशा घटना सातत्याने घडत आहे, हे लक्षात घेता सदस्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पवार यांनी केली. रश्मी शुक्ला यांना सरकार पाठीशी का घालीत आहे, असा प्रश्न पवार यांनी केला. महत्वाच्या विषयावर चर्चा घेण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, असे पवार यांनी लक्षात आणून दिले. त्या नंतरही अध्यक्ष प्रश्नोत्तराचा तास घेण्यावर ठाम असल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी भास्कर जाधव आक्रमक झाले होते.

Previous articleफोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण ? रश्मी शुक्लांना कोण वाचवतंय !
Next article३२ वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलयं : आदित्य ठाकरेंचा सत्ताधा-यांवर निशाणा