राजकीय सुडबुध्दीतून आपल्या विरूध्द तक्रारी – धनंजय मुंडे
मुंबई नगरी टीम
मुंबई : पुस येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतक-यांना व बँकांना ५ हजार ४०० कोटी रूपयांना बुडवणा-या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.सदर जमिनीची खरेदी नोंदणी कार्यालय अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसिल कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमिन देवस्थानची नाही, या प्रकरणी चंद्रकांत गिरी व इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे. असे असतांना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजुने आहेत. या प्रकरणी या पूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेल्या असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत असा आरोप मुंडे यांनी केला.
या प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी ५ हजार ४०० कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणुक केली, या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सुडबुध्दीतून त्यांचे जावाई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.