सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टी धारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फुटापर्यंत वाढविण्याची मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शेख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून यासंबंधीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, झोपडपट्टीतील नागरिकांना सध्या पुनर्विकासात देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ अपुरे पडते. पाच व्यक्तीचे कुटुंब असेल तर जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे ‘एसआरए’ योजनेनुसार पात्र झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ. फुट केल्यास त्यांच्या राहणीमान सुधारण्यास मदत होईल.झोपडपट्टी धारकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना हक्काचे मोठे घर मिळावे, यासाठी तातडीने मंजुर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फूट करण्याचा निर्णय घ्यावा, असेही शेख यांनी या निवेदनात केले आहे.