मुंबई नगरी टीम
मुंबई : रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समुह विद्यापीठ व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.समुह विद्यापीठासाठी लागणारा निधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत ३३ कोटी रुपये केंद्र शासन आणि २२ कोटी रुपये राज्यशासन असा एकूण ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव असून तो मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येईल.रयत शिक्षण संस्थेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच ३० हजार विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. यासाठी पदभरती करणे आवश्यक आहे. या पदभरती प्रक्रियेला तत्वता मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.