भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नव्हे तर एकजुटीने लढली पाहिजे

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे.भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे.हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई दौ-यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला वगळून भाजपाला पर्याय उभा राहिल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ममता बॅनर्जी यांनी कुणी लढतच नसेल तर आम्ही काय करायचे ? असा सवाल केला तसेच सर्वांनी जमिनीवर उतरून लढले पाहिजे, असेही सांगितले.त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत.राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले.भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल गांधी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे पटोले म्हणाले.

Previous articleओमिक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विमानतळावरील निर्बंध आणखी कडक
Next articleमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एका बड्या अधिका-याचे निलंबन