निवडणुकीपूर्वीच सुनील तटकरेंना हादरा ?
मुंबई नगरी टीम
रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना निवडणुकीआधीच हादरा बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवविण्यात येत आहे तर राष्ट्रवादीचे पालीतील नेते आणि प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे तटकरे यांच्यासमोरील लोकसभा निवडणुकी मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आंबेत ग्रामपंचायत आणि श्रीवर्धन मतदार सघांचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. यांच्या विकासासाठी जो मदत करेल त्याला आमची साथ असेल,असे नाविद अंतुले यांनी म्हटले आहे. नाविद अंतुले हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे तर राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई यांनी जवळ जवळ शिवबंधन बांधले आहे. नाविद अंतुले आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनंत गीते यांच्या वाढत्या भेटींमुळे ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आंबेत ग्रामपचांयत आणि श्रीवर्धन मतदारसघांचा विकास रखडलेला होता.अनंत गीते यांनी आंबेत ग्रामपचांयतच्या विकासाकरिता निधी दिला. त्यामुळे नाविद अंतुले यांनी अनंत गीतेंना खुला पाठिंबा जाहीर केला आहे.
माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले हे राजकारणात फारसे सक्रीय नाहीत.मात्र अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे अंतुले कुटुंबाची राजकीय ताकद आहे. नाविद अंतुले यांनी शिवसेनेला मदत केल्यास राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना कठीण स्थितीला सामोरे जावे लागू शकते.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, प्रकाश देसाई आता स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश देसाई यांचीही राजकीय ताकद प्रभावी आहे.