मोदी-शहांना हरवायचय : राज ठाकरे
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीत न उतरता केवळ पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाजपला हरवण्यासाठी आपण काम करणार आहोत, असे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांना भाजपला हरवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
राज ठाकरे म्हणाले की,देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, असे मी यापूर्वी सांगितले होते.शरद पवार आणि मी विमानात एकत्र भेटलो होतो, असही त्यांनी सांगितले.भाजपवर टीका करताना ते म्हणाले की,देश आता खूप मोठ्या संकटात आहे.आताची निवडणूक मोदी, शहा विरुद्ध देश अशी आहे. त्यांना आता हरवायचे आहे, त्यासाठी मी काम करणार आहे, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवरही टीका केली. पवारांनी सांगितले होते, की,आम्हाला मनसेसोबत हवा आहे. त्यानंतर मी त्यांना फोन केला, कुठे भेटता येईल? आघाडी करायची असे आम्ही काय बोललो का? त्यावर त्यांचे उत्तर नाही, असेच आले. माझ्याशी न बोलता तुम्ही वाटेल तेे का बोलता?, अशा शब्दांत मी त्यांच्याशी बोललो होतो. मी त्यांना तेव्हाच सांगितले, की लोकसभा लढविण्यास मी तयार नाही. माझ्यासाठी कोणताही पक्ष नाही.
दरम्यान, राज ठाकरे यांनी चौकीदाराच्या मोहिमेबाबतही मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.मोदीमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हे मी आधीपण बोललो होतो.तसेच, यापुढे मी ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहा यांच्या विरोधातल्याच सभा असतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले. भाजपचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या. त्यांनी देशाला पाच वर्षे लुटले आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही त्यांना लुटले तर काही हरकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
भाजपकडून चौकीदारचे कॅम्पेन सुरु आहे.तिची खिल्ली उडवताना राज ठाकरे यांनी निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असा सवाल केला.भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे.खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदी आणि शहा राजकीय पटलावरून दूर झालेच पाहिजेत. भाजपविरोधातच भूमिका घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. मोदींसारखा खोटा पंतप्रधान मी आजवर पाहिलेला नाही. मोदींकडून गुजरातची खोटी टिमकी वाजवण्यात आली,असा आरोप त्यांनी केला.