बेरोजगारी आणि दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष- राज ठाकरे

बेरोजगारी आणि दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष- राज ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे  महत्त्वाच्या मुद्द्यांकडे  लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांचे देखील दोन गंभीर विषयांकडे दुर्लक्ष झाले आहे असल्याचे राज ठाकरे यांनी या पत्रात नमुद केले आहे.

राज ठाकरे यांचे पत्र……

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम तमाम मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.अगदी परवाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय झालेलं असल्यामुळे सर्वांचंच, अगदी माध्यमांचं देखील दोन गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झालं.दुष्काळ आणि बेरोजगारी,महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला ह्या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही.महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते तर ह्यावेळचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे.

एका बाजूस दुष्काळामुळे गावच्या गावं ओस पडली आहेत आणि तिथल्या लोकांचे तांडे शहरांकडे उपजीविकेच्या शोधात येत आहेत तरदुसरीकडे शहरांमध्ये फक्त असंघटित नाही तर अगदी उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण-तरुणी देखील त्यांच्या नोक-या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्येच पगार वेळेवर होत नसतील तर खाजगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल?ह्या दोन्ही विषयात आता सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनी देखील अधिककाटेकोरपणे ह्या दाव्यातील तथ्यं तपासायला हवीत. निवडणुका येतील, जातील, पण त्याच्यापलीकडे जाऊन आपल्याला ह्या विषयांकडे बघायला हवं.सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो.

दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेऊन आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेततिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा. आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र दिन’ ह्या शिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करू नका, गाफील राहू नका.

Previous articleभाजप सरकार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात अपयशी : अशोक चव्हाण
Next articleदुष्काळ आणि पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करा : धनंजय मुंडे