ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये अशी मागणी करतानाच आतमध्ये जाण्यावर आक्षेप घेतला आहे आणि याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लेखी पत्रव्यवहारही केला आहे.

महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी नियोजन व अंमलबजावणीबद्दल निवडणूक आयोगाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिनंदनही केले आहे.आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते असे सांगतानाच लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्रॉंगरुमध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी दिल्या गेलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत आमचा आक्षेप असून याचा निषेध करत असल्याचेही  पाटील म्हणाले.

दरम्यान यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना या स्ट्रॉंगरुमध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली.मुळात सीलबंद मशिन्स जवळ उमेदवाराला जाण्याचे कारण नसते. ईव्हीएम मशीनमधील डेटामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेत बदल केला जावू शकतो अशी शंका जनमानसामध्ये दाट ‌शकता आहे याबाबत विरोधी पक्षांनी सबळ पुरावे सादर करत केले आहेत शिवाय विरोधी पक्षांनी आपले आक्षेपही वेळोवेळी नोंदवले आहेत.

सत्ताधारी पक्षाचे उमेदवार या तांत्रिक करामतीचा अवलंब करुन दुरुस्त पद्धतीने या ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या निकालामध्ये बदल करु शकतील अशी भीती पाटील व्यक्त केली आहे.

मतदान पश्चात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होवून भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या कायद्यामध्ये अधिक्षेप होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये रिमोट पध्दतीने अनेक बदल घडविता येतात हे प्रगत तंत्रज्ञानाने सिद्ध करुन दाखवले आहे. त्यामुळे याबाबत आपण विषाची परीक्षा घेवू नये. कुठल्याही आशंकेला जागा राहिल आणि लोकांचा लोकशाही पद्धतीवरील विश्वास उडेल अशा पद्धतीचे कोणतेही निमित्त निर्माण होवू नये यासाठी दक्ष राहावे असे आवाहनही पाटील यांनी केले.

एकाच पूर्वनिश्चित वेळी त्या त्या विभागातील सर्व उमेदवारांना बोलवून त्यांची योग्य पद्धतीने कसून तपासणी करुन त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दुरनियंत्रित उपकरण नाही ना याची खातरजमा करून मगच या स्ट्रॉंगरुमध्ये परिनिरीक्षणार्थ प्रवेश द्यावा अशीही मागणी  पाटील यांनी केली आहे.

Previous articleदुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल
Next articleमतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये ‘जॅमर’बसविण्याची काँग्रेसची मागणी