मुंबई महानगरपालिका बरखास्त करा-अजित पवार

मुंबई महानगरपालिका बरखास्त करा-अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : २० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळे व्यवस्थित काम करत आहे असे सांगितले जातेय. त्यामुळे महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादपवार यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईसह राज्यात कोसळलेल्या जलसंकटावर बोलताना अजितदादा पवार यांनी शिवसेनेसह सरकारवर निशाणा साधला.मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते त्यामुळे याच्या खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केले.मनुष्याला एकदाच जन्म मिळतो त्यामुळे किडयामुंग्यासारखं लोकं मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. हा सरकारचा कमीपणा आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणीही  पवार यांनी केली.

मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. लोकांचा जीव धोक्यात आलाय. लोकं जखमी झाले आहेत. त्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी करतानाच गेलेली व्यक्ती भरीव मदत दिल्यामुळे परत येत नाही. कर्ती व्यक्ती गेली की, घर आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होते. ती व्यक्ती परराज्यातील, परजिल्हयातील असो असेही पवार म्हणाले.मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबले आहे आणि मुंबईचे प्रथम नागरीक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे असा टोला अजितदादा पवार यांनी महापौरांना लगावला.मिठी नदीचा मुद्दाही अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. मिठी नदीसाठी केंद्राने आर्थिक मदत केली आहे आणि राज्यसरकार वेळोवेळी मदत करत आहे असं असताना मिठी नदीचे काम का पुर्ण नाही अशी विचारणा केली.मुंबईकरांना सकाळपासून त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडला की याची चर्चा होते. ही तेवढ्यापुरती चर्चा होवून तेवढ्यापुरतं उत्तर मिळतं परंतु याची जबाबदारी कुठल्या खात्यावर आहे हे सांगितले जात नाही. कामाचा दर्जा चांगला राहणार नसेल तर हे सरकारला भूषणावह नाही असेही  पवार म्हणाले.

पुण्यातील कोंढवा, सिंहगड परिसरातील दुर्दैवी घटना असेल किंवा मुंबईतील मालाड परिसरातील दुर्दैवी घटना असो याबाबत अजित पवार यांनी बिल्डर आणि संबंधित अधिकारी यांच्या एकंदरीत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Previous articleकोंढवानंतर मुख्यमंत्र्यांनी बोध घेतला नाही का? – सुप्रिया सुळे
Next articleदुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे