दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे

मुंबई नगरी टीम

मुंबई : पावसामुंळे मुंबईकरांचे जनजीवन ठप्प झालंय आहे मात्र मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे अशा शब्दात कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण टीका केली आहे.

दोन दिवस पडणा-या पावसामुळे मालाड, कल्याण आणि पुण्यात भिंत कोसळून २५ बळी गेले असून, मुंबईत रस्ते वाहून गेलेत. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार कारणीभूत नाही का असा सवाल चव्हाण यांनी करून, कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना ‘क्लीन चीट’ देईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का?पुन्हा अशा घटना घडणार नाहीत,याची हमी मिळणार आहे का असा सवाल केला आहे.उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरात प्रचंड पाणी साचलंय. तळमजल्यावर राहणारे लोक आपलं किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवताहेत. किमान ते बघून तरी’आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ हे मान्य करून शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली.

मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक व बाहेरगावचे प्रवासी अडकून पडले आहेत. मदत तर सोडाच पण रेल्वे केव्हा सुरळीत होईल, याची साधी माहितीसुद्धा त्यांना मिळत नाहीये. लोक प्रचंड हालापेष्टा सहन करताहेत. सरकारने युद्धस्तरावर उपाय करून हे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतील, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Previous articleमुंबई महानगरपालिका बरखास्त करा-अजित पवार
Next articleमालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी : मुख्यमंत्री