खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास

खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.आज जाहीर करण्यात आलेले खातेवाटप हे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असून,अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होताच संपूर्ण मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे कोणतेही खाते ठेवले नसले तरी शिवसेनेने आपल्याकडे महत्वाचे गृह आणि नगरविकास खाते ठेवले आहे.या दोन्ही महत्वाच्या खात्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

२८ नोव्हेंबर रोजी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह,शिवसेनेचे एकनाथ शिंदे,सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॅाग्रेसचे नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर नागपूरात होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्यीही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग,एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृत व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन ही खाते देण्यात आली आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय तर नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मान्यता दिली आहे.सध्या वाटप करण्यात आलेली खाती ही हिवाळी अधिवेशनापर्यंत संबंधित मंत्र्यांकडे असतील. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.त्यानंतरच संपूर्ण मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात येणार आहे.

Previous articleओबीसी,धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल
Next articleरक्तात बेईमानी नाही त्यामुळे पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे