मनसेसोबत युती केल्यास भाजपाचे नुकसान : रामदास आठवले 

मनसेसोबत युती केल्यास भाजपाचे नुकसान : रामदास आठवले 

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपने युती करू नये,भाजपने मनसेशी युती केल्यास भाजपचे नुकसान होऊ शकते.रिपब्लिकन पक्षाची भाजपला खंबीर साथ असल्याने दलित अल्पसंख्यांकांचे मतदान भाजपला मिळत आहे.त्यामुळे भाजपने मनसेशी युती करणे योग्य नसल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

मनसेची राजकीय भूमिका ही प्रांतवादी राहिली आहे.प्रांतवादातून हिंदी भाषिक उत्तर भारतीयांविरुद्ध मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मनसेशी युती करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाचे निश्चित नुकसान होईल.भाजपने मनसेशी युती केल्यास उत्तर भारतातच नव्हे तर मुंबईतही भाजपचे नुकसान होईल असा ईशारा  आठवले यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केंद्र सरकारवर बेवड्यासारखे वागणारे सरकार अशी टीका केली आहे.त्या पार्श्वभूमीवर  जे नेते सरकारवर बेवड्यासारखे वागणारे सरकार अशी टीका करतात त्या नेत्यांनी गारुड्या सारखे वागू नये असा प्रतिटोला आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानानुसार चांगले काम करीत आहेत. मात्र त्यांच्या वर आरोप करणारे नेते गारुड्या सारखे वागत आहेत.असे आठवले यांनी म्हंटले आहे.

Previous articleउतणार नाही मातणार नाही,जनसेवेचा वारसा सोडणार नाही : धनंजय मुंडे
Next articleइज ऑफ लिव्हिंगचे नियोजन होणे आवश्यक : आदित्य ठाकरे