जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम
मुंबई : महविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प राज्यातील जनेतची दिभाभूल करणारा व फसवा आहे.या अर्थसंकल्पातून सरकारने राज्यातील शेतकरी, आदिवासी, मच्छिमारांच्या तोंडाला पाने फुसली आहेत.या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील भौगोलिक साधलेला नाही, तर केवळ एक-दोन जिल्ह्यासाठी तयार केलेला अर्थसंकल्प असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपयाची कर्जमाफी करणार, शेतक-यांना चिंतामुक्त करणार व कर्जमुक्तीचे वचन देणारे नेते आता सत्तेत आले, पण त्यांनी आता या अर्थसंकल्पात शेतक-यांची सपशेल निराशा केल्याची टिका करताना दरेकर म्हणाले की, ज्या कोकणाने शिवसेनेला जास्त आमदार दिले, ज्या कोकणच्या जनेतने त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी मात्र कोकणाच्या विकासासाठी सुमारे ३ ते ४ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असताना कोकणासाठी तुटपुंजी तरतूद करण्याचे पाप या सरकारने केले. कोकणातील मच्छिमारांनीही महाविकास आघाडी सरकारने अक्षरश वा-यावर सोडल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

वरळी येथील दुध डेअरीच्या मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राच्या नावाखाली लाटण्याचा डाव या महाविकास आघाडी सरकारचा आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याएवजी हा भूखंड हडपण्याचा प्रकार सरकार करीत आहे, असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, अर्थसंकल्पात आदीवासींसाठी कुठलीही नवीन योजना व भरीव तरतुद केलेली नाही. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणा-या या सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कुठलीही ना नवीन योजना आणली ना शिक्षणासाठी भरीव तरतूद केली अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Previous articleठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात “विकासाचा वर्षाव”
Next articleअर्थसंकल्प नव्हे, हे तर जाहीर सभेतील भाषण : देवेंद्र फडणवीस