अन्यथा फार मोठे परिणाम भोगावे लागतील !

मुंबई नगरी टीम

मुंबई: प्रचंड प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका,पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन  करतानाच लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे नाही तर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी  फेसबुक पेजवरुन जनतेशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी जनतेला कळकळीचे आवाहन करीत  पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा अशी विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसाचे लॉकडाऊन का जाहीर केले हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल तर या दिवसात त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे नाहीतर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील अशी भीतीही त्यांनी  व्यक्त केली आहे.जगात ५ लाख ९ हजार ६४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. २४ तासात ४६ हजार ४८४ ही लागण होत आहे. तर अडीच हजार मृत्यूमुखी पडले आहेत.दुर्दैवाने हे आकडे आपल्याला ऐकायची वेळ आली आहे. भारतात ७२४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ७५ नव्या केसेस आहेत. आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात ४ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.जगात अशी आकडेवारी कधी ऐकली गेली नाही. इतका गंभीर स्वरूपाचा हा व्हायरस आहे त्यामुळे आपण याबाबत गंभीर आहोत का याचा अभ्यास करायला हवा असेही पाटील म्हणाले.

सांगली जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी जयंत पाटील यांनी तिथली परिस्थितीही समोर मांडली. एकूण २३ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शिवाय एक कोल्हापूरहून केस आली आहे अशी २४ लोकांना ही लागण झाली आहे. हा व्हायरस परदेशातून आला आहे. आतापर्यंत ७७६ लोकांनी परदेश प्रवास केला आहे. त्यापैकी ३७ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर १२ लोकांचे पॉझिटिव्ह आले आहेत. ६९४ लोकांना कोरोटाईंन करण्यात आले आहे. ३२ जणांना १४ दिवस पुर्ण तर ५६२ लोकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ८ व्यक्तींनी याचा भंग केला म्हणून सक्तीने ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २४ लोकं कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हयात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचेही  पाटील यांनी सांगितले.

हे संकट टाळायचे असेल त्याचा बिमोड करायचा असेल तर घरातच रहा. काही लोक रिलॅक्स होण्यासाठी बाहेर विनाकारण फिरत आहेत. मात्र पुढचे १४ दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा. घरात बसणे हेच पुढारपण आहे. कोरोना व्हायरस घालवण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना राज्यभरातून अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत काळजी घ्या घराबाहेर पडू नका अशा सूचनाही  पाटील यांनी जनतेला दिल्या.

Previous articleप्रविण दरेकरांच्या पुढाकाराने मागाठाण्यात घरपोच भाजीपाला वाटप अभियान
Next articleऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा;त्यांना घरापर्यंत  पोहोचवा