कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या राजभनवातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले ३० टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यपालांनी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.

 कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.या निर्णयानुसार राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येणार नाही.केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहूण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तु वा स्मृतीचिन्ह देण्यात येणार नसून,पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात आला आहे. एवढेच काय राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा असे आदेश काढण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजभनवाला भेटी देणा-या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नयेत अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन करून प्रवास खर्चात बचत करण्यात येणार असल्याने या उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये १० ते १५ टक्के बचत होईल असा अंदाज आहे.राज्यपालांनी आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर  ३० टक्के वेतन करोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.आज जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपुर्ण ठरेल असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.

Previous articleसत्य सांगायला एक,फेकाफेकीसाठी ३ लोक लागतात!
Next articleकोरोनाशी लढा देत असतानाही अशोक चव्हाणांनी केंद्राकडे केली ही मागणी