सरपंच उपसरपंचासह सदस्‍यांना सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी

मुंबई नगरी टीम  

मुंबई : राज्‍यात  या वर्षात १४ हजार ३१४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. राज्‍यातील कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव आणि वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्‍यांना सहा महिने मुदतवाढ देण्‍यात यावी व त्‍वरीत याबाबत अध्‍यादेश काढण्‍यात यावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की,ज्‍या ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे अशा १४ हजार ३१४ ग्राम पंचायतींमध्‍ये प्रशासक नेमण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहे. मार्च २०२० च्‍या विधीमंडळ अधिवेशनात राज्‍य शासनाने सहकारी संस्‍था, मध्‍यवर्ती सहकारी बँका यांना मुदतवाढ दिली.त्‍याच धर्तीवर सदर ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच व सदस्‍यांना काळजीवाहू म्‍हणून मुदतवाढ देण्‍याची आवश्‍यकता आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्‍याही पक्षाच्‍या चिन्‍हावर, विचारावर लढली जात नाही. ग्रामीण भागातील जनता आपल्‍या गावातील प्रश्‍न सोडविण्‍यासाठी या निवडणूकीत सहभागी होवून सरपंच,उपसरपंच, सदस्‍यांना निवडून देतात.मात्र पालकमंत्र्यांच्‍या माध्‍यमातुन या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसविण्‍यात यावे असा आग्रह ग्रामविकास विभागाचे काही अधिकारी करीत आहेत. या १४ हजार ३१४ ग्राम पंचायतींमध्‍ये कोकण विभागामध्‍ये ८१३, पुणे विभागामध्‍ये २८८५, नाशिक विभागामध्‍ये २५०६, अमरावती विभागामध्‍ये २४७३, औरंगाबाद विभागामध्‍ये ४१२१, नागपूर विभागामध्‍ये १५२५ ग्राम पंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांसह सहा महिने मुदतवाढ मिळणे अत्‍यंत गरजेचे आहे. प्रशासक बसवून लोकशाही मुल्‍यांचा हास न करता लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करण्‍याच्‍या दृष्‍टीने याप्रकरणी त्‍वरीत सहा महिने मुदतवाढ देण्‍यासाठी अध्‍यादेश काढण्‍याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू होणार मात्र मॉल्स मार्केट बंद राहणार
Next articleकलाकारांना दिलासा : चित्रपट,मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी