दणका : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीच्या चौकशीचे आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : अलिबाग येथील मराठी वास्तू विशारद अन्वय नाईक यांच्या प्रकरणातील तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासंदर्भातील मागणीचे पत्र गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना लिहिले होते. तसेच प्रताप सरनाईक आणि नाईक कुटुंबियांनी १५ ऑगस्टला सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे नाईक कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

यावर प्रतिक्रिया देत अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या म्हणाल्या, “गृहराज्यमंत्र्यांकडून याची दखल घेण्यात आली असून,रायगड पोलिसांना योग्य त्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु हा आदेश केवळ कागदावर राहू नये, आणि या आदेशाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा”, अशी मी विनंती करत असल्याचे अक्षता यांनी म्हटले. तसेच सुशांत सिंहच्या प्रकरणाने जसा वेग घेतला आहे.तसाच आमच्या प्रकरणानेही घ्यावा, अशी विनंती शासनाला करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. याच ठिकाणी अन्वय यांच्या आईचा देखील मृतदेह आढळून आला होता. अन्वय यांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव लिहून आपल्या आत्महत्येला जबाबदार धरले होते. तसेच अन्य दोघांचीही नावे यामध्ये नमुद करण्यात आली होती. मात्र तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून अर्णब यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नाईक कुटुंबाकडून करण्यात आला होता.नाईक कुटुंबाची अशी अवस्था पाहून आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या गृहमंत्री आणि  गृहराज्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे सरनाईक म्हणाले. “ज्याप्रमाणे सुशांतच्या प्रकरणात सीबीआय दखल देते, सीआयडी दखल देते, बिहार पोलिस दखल देते. मुंबई पोलिसांकडून चांगल्या प्रकारे तपास सुरू असतानाही जर इतर पोलीस खात्याने लक्ष देण्याची गरज असेल तर, अन्वय नाईक यांच्या प्रकरणात सुद्धा बारकाईने तपास करून त्यांच्या पत्नीला न्याय द्यावा अशी माझी भूमिका होती”, असे प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच “विद्यमान सरकारच्या काळात अक्षता नाईक यांना नक्कीच न्याय मिळेल”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleमंत्री मुश्रीफ यांची तत्परता;कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत
Next articleनारायण राणेंना खिंडीत गाठण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ;खासदार राऊतांचे गंभीर आरोप