मुंबई नगरी टीम
नागपूर : मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी मांडली आहे.तसेच पोलिसांबद्दल असे विधान करणाऱ्याचा आम्ही निषेध करतो,असेही ते म्हणाले.प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांनी कंगनाच्या वादग्रस्त विधानावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तुलना ही स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. महाराष्ट्र आणि मुंबईचे पोलीस अतिशय सक्षमपणे काम करत असतात.कोरोनाच्या काळात देखील पोलिसांनी कशाप्रकारे संक्रमण रोखण्याचे काम केले हे सर्वांनी पाहिले.अशा परिस्थितीत एखाद्या सिनेक्षेत्रातील कलाकाराने असे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. जर महाराष्ट्र आणि मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही”, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
कंगनाच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता स्वतः गृहमंत्र्यांनी कंगनाच्या या विधानावर संताप व्यक्त करत महाराष्ट्र व मुंबईत न राहण्याचा सल्ला तिला दिला आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगनावर बॉलिवूडसह राजकीय नेतेही खवळले आहेत. असे असतानाही कंगनाने पुन्हा एकदा नवे ट्वीट करत आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहोत, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे तिने म्हटले आहे. त्यामुळे आता कंगनावर कोणती कायदेशीर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.