बेरोजगारांना मोठा दिलासा : राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बेरोजगार तरूण तरूणींना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे  राज्यापुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बेरोजगार तरूण तरूणींना मोठा दिलासा दिला आहे.राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याची माहिती राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मंत्रिमडळाच्या बैठकीनंतर दिली.सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या जम्बो पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी पोलीस भरती होणार आहे.पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येणार आहे.

Previous articleविधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची कोरोनावर मात ;नेहमीच्या जोमाने कार्यालयात रुजू
Next articleकांदा निर्यातबंदी रद्द करेपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरुच राहणार