ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : उद्यापासून मेट्रो,आठवडी बाजार,ग्रंथालये सुरु होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मिशन बिगनिंग अंतर्गत उद्यापासून मुंबईतील मेट्रो,राज्यात असलेली सरकारी आणि खाजगी ग्रंथालये तसेच ग्रामिण भागाचा आर्थिक कणा असलेले आठवडी बाजार सुरू होणार आहेत.यासंदर्भात राज्य सरकारने आज नियमावली जारी केली आहे.

गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली मुंबईतील मेट्रो उद्यापासून सुरू होणार असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांची लाईफ लाईन सुरू होण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.सरकारी तसेच खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधिच्या नियमांचे पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.उद्या १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालये सुरु होणार आहेत.दरम्यान राज्य सरकारकडून शाळा,महाविद्यालये सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नसली तरी शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.परिपत्रकानुसार राज्यातील शाळा,महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण,टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय राज्यातील ग्रामिण भागातील आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.याशिवाय दुकाने दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.राज्य सरकारने आज जारी केलेल्या नियमावलीत मुंबईतील लोकल आणि राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला नसल्याने यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Previous articleराज्यपालांची भाषा आणि वक्तव्य घटना विरोधी
Next articleइतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”,राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात