लोकं गायी म्हशीचा आवाज सहन करतील पण..; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नुकतेच एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.भाऊबीजेच्या निमित्ताने अमृता यांनी हे गाणे गायले असून सोशल मीडियावर ते चांगलेच व्हायरल झाले आहे.यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दिग्दर्शक,निर्माते महेश टिळेकर यांनी अमृता यांच्या गाण्यावर सडकून टीका केली आहे. तसेच अमृता यांनी पुन्हा गाऊ नये,असा सल्लाही त्यांनी दिला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहली असून ती सध्या बरीच चर्चेत आहे.

महेश टिळेकर यांची नेमकी पोस्ट काय?

“हिला नको गाऊ द्या, चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही, हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही. पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते. अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील, पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही.

आपल्याकडे जुनी म्हण आहे “आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे ? त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आहे.जर ह्या गायिकेकडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी. पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या “आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा”.

Previous articleशरद पवारांचा उत्तर महाराष्ट्रातील दौरा रद्द,खडसेंनी सांगितले ‘हे’ कारण
Next articleबाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे